मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खर्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घ्यायला सुरुवात करणार आहेत. ठाकरे बंधू आता मैदानात उतरुन भाजप आणि शिंदे गटाविरोधात तोफ डागणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळेल, अशी अटकळ त्यांच्या समर्थकांकडून बांधली जात आहे.
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा विक्रोळी येथे होणार आहे. आगामी काळात दोन्ही नेत्यांच्या सात ते आठ संयुक्त सभा नियोजित असून, त्यातील पहिली सभा आज पूर्व उपनगरात होत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना आणि मनसेच्या शाखांना देखील उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे भेटी देणार आहेत. तर दुसरीकडे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही मुंबईत दोन संयुक्त सभा घेणार आहेत.
दरम्यान आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, आनंद दुबे, आदेश बांदेकर यांच्या नावाचा समावेश आहे.
ठाकरे बंधूंना यश मिळणार नाही : फडणवीस
मात्र, मुंबईत काही झालं तरी ठाकरे बंधूंनी यश मिळणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला आहे. असं आहे की, या दोघांची मतं संपल्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. २००९ साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट लागला असता. आता दोघेही एकत्रित येऊन फायदा नाही. दोघांच्याही मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, आता यांना मराठी माणूसही मतं देणार नाही आणि अमराठी नागरिकही मतदान करणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, ठाकरे बंधू एकत्र आल्याची अ्ाहाला काहीच चिंता नाही. मुंबईत भाजप निश्चितपणे निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मराठी माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घराचा आहे. दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नाही म्हणून मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. आज दक्षिण मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला आम्ही घरं देतोय. ठाकरे फक्त बोलत राहिले, मोर्चे काढले, मोर्च्यांनी पोट भरतं का? शिवसेनेची सत्ता असताना ठाकरेंनी मराठी माणसांच्या घरांसाठी एकतरी प्रकल्प केला का? आज आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करुन ८० हजार मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचवले. मी हा प्रकल्प खासगी बिल्डरच्या हातात जाऊन दिला नाही. त्यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी बीडीडी चाळीचा प्रकल्प म्हाडाच उभारेल, असा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.